ध्यास

Friday, April 24, 2020

तू सोडून गेलीस तेव्हा 
आसवे गाळली नाही 
स्मरणात तुझ्या मी फक्त
लिहिल्यात कविता काही 

नव्हतीस सोबती म्हणुनी
मी उदास झालो नाही 
पण पावसात भिजताना
मोहरलो न एकदाही 

डोळ्यांना अजुनी माझ्या
विसराया जमले नाही 
प्रत्येक चेहऱ्यामध्ये
ते रूप तुझेच पाही 

तू येशील जर परतुनी
कधी आठव येता माझी 
होतील सावळे नभ हे
गातील दिशा या दाही 

ऐकून साद ह्र्दयाची
मिटवून अंतरे सारी 
तू परतावे मजपाशी
हा ध्यास उराशी राही 

-काव्य सागर 

1 comments:

Post a Comment