आता सारे शांत शांत

Tuesday, June 29, 2010

आता कसे सारे शांत शांत होईल

मेघ दाटून येतील, पाऊस ही बरसेल
मग सारी सृष्टी निवांत होईल

जलधारांनी या धरणीची आग शमेल
मग उन्हाळी ऋतूचा सुखांत होईल

दु:खाचे मळभ जाईल, नभ सावळे होईल
मग ही धरणी सुखाचा प्रांत होईल

उन्हे कोवळी पसरतील, इंद्रधनू उतरेल
या धरेवरी मग स्वर्गाचा भ्रांत होईल

-काव्य सागर

कारणे घ्या..

Tuesday, June 22, 2010

मी कविता करतो कारण...
तेच मला जमते
आणि त्याहून इतर काही जमत नाही
जमत असले तरी रुचत नाही
म्हणून जे काही सुचते ते लिहित जातो

मी कविता करतो कारण...
इतर कशाहीपेक्षा
त्यातच मन रमते
कविता केल्यावर होणारा आनंद
शब्दात मांडता येत नाही
(सगळ्याच गोष्टी कवितेतून व्यक्त करता येत नाहीत)

मी कविता करतो कारण...
जेव्हा जेव्हा लिहायला घेतो
तेव्हा मीच मला गवसत जातो
प्रत्येक कविता नवी उमेद,
नवा जन्म देऊन जाते

मी कविता करतो कारण...
फारसा वेळ लागत नाही
अस्वस्थ मनाला कागदावर उतरवले की झाले
खासा वेळ काढून
लिहिण्याचा कार्यक्रम आखता येत नाही

मी कविता करतो कारण...
फार खर्चही होत नाही
कोरा कागद आणि पेन एवढ्या
फुटकळ साहित्यावर अनेक
कविता रंगवता येतात

मी कविता करतो कारण...
कविता करायला आवडतात
हव्या तशाच कविता लिहिता येतात
सूर लागला नाही अशी
कारणे द्यावी लागत नाहीत

मी कविता करतो कारण...
शब्दच येतात बहरुन
मी फक्त लिहिण्याचे कष्ट घेतो
अन् कित्येकदा तेही घेत नाही!

मी कविता करतो कारण...
गाणे जरी जमत नसले
तरी शब्द तालावर घोंगावत राहतात
अन् अंतरंगीचा सूर लाभला
तरी कवितेचे गाणे होतेच

मी कविता करतो कारण...
एकटेपणाला याहून चांगली
सोबत नाही
अन् कवितेशिवाय एकाकी जीवन
शोभत नाही

मी कविता करतो कारण...
...कारण हा माझा प्रांत आहे
कविता करायला हजार कारणे सापडतील
पण कविता न करण्याची कारणे
कुणाला द्यावी लागत नाही
-काव्य सागर

लाचारी

Monday, June 21, 2010

आजपर्यंत कायम ताठ मानेने जगत आलो
कधीच हार मानली नाही
कधीच लाचारी पत्करली नाही
कधीच परिस्थितीपुढे हात टेकले नाही...

...पण हल्ली कविता करायला लागल्यापासून
खाली मानेने निमूटपणे लिहित चाललो आहे
-काव्य सागर