आसक्ती

Thursday, April 29, 2010

मला काय हवे आहे?
माहीत नाही...खरंच माहीत नाही...
मला कसलीच आसक्ती नाही
मी कशाला जगत आहे ? कोणासाठी जगत आहे?
आपल्या लोकांसाठी? छे!
प्रेम, आपुलकी, माया कसलीच बंधने मला बांधत नाहीत
मग काय हवे आहे मला?

पैसा, नाव, प्रसिद्धी की अजून काही?
पण मला कशाचाच लोभ, हव्यास नाही
मला फक्त जगायचंय!
जगण्याच्या उमेदीपुढे सारे थिटे
आणि तितकेच फसवे आणि खोटे !

मला कसलीच गरज भासत नाही
भौतिक गरजा आहेत पण त्या
फक्त शरीर जगवण्यासाठी
मनाचे काय?
ते कुठेच थांबत नाही
कुठेच रमत नाही

कविता करतो मी
पण फक्त सुचतात म्हणून
त्यांचे व्यसन नाही जडले अजून
इतर ही अनेक छंद आहेत
पण छंदांचा कंटाळा आला तर काय करावे?

काय केले म्हणजे जीवास शांतता लाभेल
नामस्मरण करावे तर देवावर श्रद्धा नाही
काम करावे तर उगाच जीवास त्रास का?

हे असे रोजचेच झाले आहे
आला दिवस ढकलण्याचे
उद्योग तेवढे सुरू आहेत
आणि हे असेच चालू राहणार
शेवटचा श्वास असेपर्यंत
बहुतेक त्यांची तरी साथ लाभेल...!

-काव्य सागर

0 comments:

Post a Comment