मी शेंगा खाल्ल्या नाही

Tuesday, February 1, 2011

मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफले टाकली नाही
मी शिक्षा करतील म्हणुनी, ती कधी उचलली नाही

भवताली दंगा चाले, तो शांतपणे बघताना,
कुणी हसता-खिदळताना, कुणी गाणी ही म्हणताना
मी निवांत वाचत बसलो, भूगोलाचे पुस्तक जेव्हा,
मज चिडवायाला देखील, पण कुणी डिवचले नाही

बेशिस्त वर्ग हा आहे, एकाहून वरचढ येथे
येताच परीक्षा जवळी, चोरुनी फाडती पाने
पण खिशात माझ्या कुठली, कॉपी वा चिट्ठी नाही
मी वळून पाहिले नाही, वा पाहू दिले नाही

धुतले न अजून मजला, मी खोडी न केली काही
निकालावर सजून दिसते, बाबांची लांबशी सही
मी मनात नाही भ्यालो, मी कुणास नाही भ्यालो
मी घरात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही

-काव्य सागर

रात्रीस खेळ चाले

Thursday, January 27, 2011

रात्रीस खेळ चाले या धुंद दारुड्यांचा
संपेल न कधीही हे खेळ बाटल्यांचा

ही दारू न स्वयंभू, सोडा तू ओत थोडा
उपवास सोडताना, बंधने सारी तोडा
पित्यास होई भारी, हा शाप श्रावणाचा

आभास बायकोचा, होतसे बाटलीत
हे सत्य नाही सांगे, चकणा या ताटलीत
भितात बायकोला हा दोष, न पिण्याचा

या साजीऱ्या क्षणाला, का असशी घाबरून
सुटतील सारे प्रश्न, घे थोडी तू पिऊन
गवसेल सूर भलता, या झिंगल्या मनाचा

-काव्य सागर

तुला प्रेम करणे जमलेच नाही...

Monday, January 10, 2011

तुला प्रेम करणे जमलेच नाही
आणि मला ते व्यक्त करणे

मी वाट पाहिली तुझ्या येण्याची
तुला वाट पाहणे जमलेच नाही
आणि मला तुझ्या वाटेवर चालणे...

मी खूप एकटा होतो तुझ्याविना
तुला साथ देणे जमलेच नाही
आणि मला तुझी साथ मागणे...

मी गुंतत चाललो होतो तुझ्यात
तुला हे गुंतणे समजलेच नाही
आणि मला ते तुला समजावणे...

मी प्रेमात पडलो खरा तुझ्या
तुला या नात्याचा अर्थ कळलाच नाही
आणि मला त्याचा अर्थ सांगणे...
- काव्य सागर

माणसे...

Monday, November 1, 2010

माणूस म्हणून जन्माला आलो तेव्हापासून...
पाहतो आहे सारी माणसे
माणसे, त्यांचे रंगीबेरंगी चेहरे, त्यांचे स्वभाव

तेव्हा कळली फक्त त्यांची नावे...
आता कुठे माणूस म्हणून कळू लागली आहेत...
आता कुठे काही मुखवटे गळून पडले आहेत...

ते गळण्यापूर्वी दिसत होते ते किती सुंदर हसरे चेहरे...
ते कळण्यापूर्वी भेटत होती न कळलेली काही माणसे...

ईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती असलेला तो प्राणी
अधूनमधून भेटतोही..पण फार दुर्मिळ...

आणि तेव्हापासून येता-जाता आरशासमोर आलो की...
माझा चेहर्‍यावर ही कुठले मुखवटे चढले नाहीत ना
याची खात्री करून घेतो...मगच माणूस म्हणून मिरवतो...!

-काव्य सागर

निर्विकार

Wednesday, September 22, 2010

हल्ली कसलाच परिणाम
होत नाही माझ्यावर
सर्व त्रास, सर्व दु:खे
निमूटपणे सहन करत राहतो मी
सर्व वेदना शांतपणे भोगत राहतो मी
शेवटी मग वेदनाच कंटाळून निघून जातात
आणि चेहर्‍यावर उरतात फक्त काही निर्विकार भाव
काहीतरी जिंकल्याचे...
बरेच काही हरल्यानंतर...

-काव्य सागर

वादळानंतर...

Thursday, August 26, 2010

साजिर्‍याशा एका संध्याकाळी
कोठून जाणे कसे वादळी वारे आले
अन् बघता बघता सारे उद्ध्वस्त झाले
माझी स्वप्ने, माझ्या महत्वाकांक्षा
सारे सारे वाहून गेले

मी शोधू पाहतोय माझी
कवितांची वही,
माझ्या गाण्यांचे रेकॉर्ड्स
पण स्मृतिभ्रंश झाल्याप्रमाणे
काहीच आठवत नाही...

आणि त्यानंतर सुन्न मनाने
डोळे मिटून घेतो
तेव्हा घुमत राहतात
त्याच वादळी वार्‍याचे आवाज
कानामध्ये, मनामध्ये...
- काव्य सागर

विश्वास

Friday, August 13, 2010

माझा विश्वास नाही!
कशावरही; कुणावरही
विश्वास बाळगावा तरी का?

या मार्गाच्या कुठल्याश्या
वळणावर 'घात' होऊन
विश्वासघात होण्याची 'शक्यता' ( विश्वास नव्हे!)
जिथे आहे तिथे-
विश्वास कुणावर ठेवावा?

म्हणूनच मी विश्वास ठेवत नाही...
असलाच तर आत्मविश्वास आहे
स्वत:वर, स्वत:च्या विचारांवर,
कर्तृत्वावर वगैरे वगैरे...

कारण इथे घात होणार नाही
असा माझा 'विश्वास' आहे

मी माझा विश्वासघात करणे
शक्य नाही....
( आणि केलाच तरी तो
कळणार कुणाला ?)

-काव्य सागर