कवितांचा पसारा

Wednesday, May 12, 2010

कविता सूचायला लागल्या
की एक सोडून भाराभर सुचू लागतात
आणि बहुतेकदा एका कवितेचा
दुसर्‍या कवितेशी कुठेही संबंध नसतो

एक ओळ गाठीशी धरून
कविता लिहायला घ्यावी
तर त्याच धाटणीच्या
अनेक ओळी रांगेत उभ्या असतात

त्यातील प्रत्येक ओळ आपआपले
रंग दाखवू लागते
मग कधी उदास...
तर कधी आशावादी
कधी वृत्तबंध...
तर कधी मुक्तछंदी

बर्‍याच ओळींच्या गोळाबेरजेतून
अनेक कवितांचा पसारा मांडतो
त्यात कित्येक कविता
एकमेकांत गुंतून पडलेल्या...

मग त्यांना शहाण्या मुलासारखे
हाताला धरून वेगवेगळ्या कवितेत मांडावे लागते
तेव्हा कुठे कविता कळू लागते
तुम्हालाही अन् मलाही...!

-काव्य सागर

0 comments:

Post a Comment