कारणे घ्या..

Tuesday, June 22, 2010

मी कविता करतो कारण...
तेच मला जमते
आणि त्याहून इतर काही जमत नाही
जमत असले तरी रुचत नाही
म्हणून जे काही सुचते ते लिहित जातो

मी कविता करतो कारण...
इतर कशाहीपेक्षा
त्यातच मन रमते
कविता केल्यावर होणारा आनंद
शब्दात मांडता येत नाही
(सगळ्याच गोष्टी कवितेतून व्यक्त करता येत नाहीत)

मी कविता करतो कारण...
जेव्हा जेव्हा लिहायला घेतो
तेव्हा मीच मला गवसत जातो
प्रत्येक कविता नवी उमेद,
नवा जन्म देऊन जाते

मी कविता करतो कारण...
फारसा वेळ लागत नाही
अस्वस्थ मनाला कागदावर उतरवले की झाले
खासा वेळ काढून
लिहिण्याचा कार्यक्रम आखता येत नाही

मी कविता करतो कारण...
फार खर्चही होत नाही
कोरा कागद आणि पेन एवढ्या
फुटकळ साहित्यावर अनेक
कविता रंगवता येतात

मी कविता करतो कारण...
कविता करायला आवडतात
हव्या तशाच कविता लिहिता येतात
सूर लागला नाही अशी
कारणे द्यावी लागत नाहीत

मी कविता करतो कारण...
शब्दच येतात बहरुन
मी फक्त लिहिण्याचे कष्ट घेतो
अन् कित्येकदा तेही घेत नाही!

मी कविता करतो कारण...
गाणे जरी जमत नसले
तरी शब्द तालावर घोंगावत राहतात
अन् अंतरंगीचा सूर लाभला
तरी कवितेचे गाणे होतेच

मी कविता करतो कारण...
एकटेपणाला याहून चांगली
सोबत नाही
अन् कवितेशिवाय एकाकी जीवन
शोभत नाही

मी कविता करतो कारण...
...कारण हा माझा प्रांत आहे
कविता करायला हजार कारणे सापडतील
पण कविता न करण्याची कारणे
कुणाला द्यावी लागत नाही
-काव्य सागर

लाचारी

Monday, June 21, 2010

आजपर्यंत कायम ताठ मानेने जगत आलो
कधीच हार मानली नाही
कधीच लाचारी पत्करली नाही
कधीच परिस्थितीपुढे हात टेकले नाही...

...पण हल्ली कविता करायला लागल्यापासून
खाली मानेने निमूटपणे लिहित चाललो आहे
-काव्य सागर

कवितांचा पसारा

Wednesday, May 12, 2010

कविता सूचायला लागल्या
की एक सोडून भाराभर सुचू लागतात
आणि बहुतेकदा एका कवितेचा
दुसर्‍या कवितेशी कुठेही संबंध नसतो

एक ओळ गाठीशी धरून
कविता लिहायला घ्यावी
तर त्याच धाटणीच्या
अनेक ओळी रांगेत उभ्या असतात

त्यातील प्रत्येक ओळ आपआपले
रंग दाखवू लागते
मग कधी उदास...
तर कधी आशावादी
कधी वृत्तबंध...
तर कधी मुक्तछंदी

बर्‍याच ओळींच्या गोळाबेरजेतून
अनेक कवितांचा पसारा मांडतो
त्यात कित्येक कविता
एकमेकांत गुंतून पडलेल्या...

मग त्यांना शहाण्या मुलासारखे
हाताला धरून वेगवेगळ्या कवितेत मांडावे लागते
तेव्हा कुठे कविता कळू लागते
तुम्हालाही अन् मलाही...!

-काव्य सागर

कोर्स

Tuesday, May 11, 2010

तशा डिग्र्या बर्‍याच
मिळवल्या आतापर्यंत !
ग्रॅज्युएशन झाले, पोस्ट ग्रॅज्युएशन झाले
सी.ए. ही झाले !
आता पुढे काय?

एखादा कवितांचा कोर्स
करीन म्हणतो...
म्हणजे तशा फुटकळ
कविता करतोच मी

पण डिग्रीशिवाय
वॅल्यू कुठे ?
म्हणूनच सध्या
'कवी' ही डिग्री मिळवण्याच्या
फंदात पडत आहे

तुम्हाला काही माहीत
असल्यास प्लीज कळवा हं !

-काव्य सागर

सुतक

Monday, May 10, 2010

माझ्या गावी दु:खाचा पूर आला
सोबतीला आसवांचा पाऊस झाला
म्हणून मी सुतक पाळले...

जोपर्यंत सारे पूर्ववत होत नाही
...तोपर्यंत
जोपर्यंत जखम भरून येत नाही
...तोपर्यंत

कदाचित काही काळानंतर
सारे पूर्ववत होईल ही
जखमा भरून येतील ही
मग पुन्हा सुखाचे दिवस येतील
अन् सुतक संपेल ही

पण...
अशी अनेक गावे असतील
जिथे कायमचाच दुष्काळ असेल
जिथे दिवस उजाडत नसेल
जिथे शेतात फक्त काटेच उगवत असतील
जिथे सुखाचे वारे वाहत नसतील

त्यांनी का आयुष्यभर
सुतकच पाळावे ?

-काव्य सागर

प्रवाह

Friday, May 7, 2010

रात्री झोपण्यापूर्वी मी मोबाईलवर गाणी ऐकत असताना
कुठून तरी ती चिमुरडी आली आणि
सर्र्कन माझ्या नकळत तिने हेडफोनची वायर खेचली
आणि एकदम...हॉस्पिटलमध्ये
शरीरात रक्त भरून घेणार्‍या पेशंटला जाग यावी
तसा मी भानावर आलो !
पाहतो तर मोबाईल मधून संगीतरूपी रक्त वाहते आहे !
मी पटकन खंडित झालेला प्रवाह जोडला
आणि पुन्हा पूर्वीसारखे संगीत वाहू लागले

तरी बरे मी झोपलो नव्हतो
नाहीतर किती रक्त वाया गेले असते
कुणास ठाऊक ?

-काव्य सागर

दु:ख नव्हतेच इतके

Friday, April 30, 2010

दु:ख नव्हतेच कधी इतके
जितके मला वाटले होते
प्रश्न ही नव्हते इतके अवघड
जे मनी दाटले होते

मी उगाचच समस्यांना
भाव देत होतो
स्वत:हून मनास माझ्या
घाव देत होतो
जे कोडे सुटणार होते सहजतेने
त्यात उगाच जीवास गुंतत होतो

अडथळे यायचेच असतात
यशाच्या मार्गात
वाट शोधताना चालायचे
आहेच काट्यांत
मी दुखर्‍या जखमेस जपताना
व्यर्थ अश्रू ढाळीत होतो

अजुन कित्येक दु:खे बाकी
आहेत जगात
मदतीस सरसावताहेत अजुनी
असहाय्य हात
माझे दु:ख होते खरे राईएवढे
ज्यास मी पर्वतासम मानत होतो

-काव्य सागर