कुठल्याश्या कवितेपायी
मी विसरून गेलो तुजला
हे भास असे प्रतिदिवशी
होतात सखे ग मजला
मी विसरून गेलो आहे
तुजवर रचल्या कविता
पण शब्द शब्द कवितेचे
मी लिहिले तुझ्याचकरिता
तू सोडून मज जाताना
जी लकेर गाऊन गेली
त्या नाजूक वेलीवरती
कवितेची फुले उमलली
हे काय मला मग झाले
कवितेचे वेडच जडले
अन शब्द ओंजळीत घेता
प्रतिबिंब तुझेच पडले
पण कवितेचे दुर्भाग्य
ती सवत तुझी बघ झाली
अन याद तुझी जपताना
माझ्यातच विलीन झाली
-काव्य सागर