Showing posts with label कवितेवर कविता. Show all posts
Showing posts with label कवितेवर कविता. Show all posts

वरदान

Sunday, March 4, 2018

शब्दांस माझिया या ताल लाभू दे
गाण्यास सूर त्याला चिरकाल लाभू दे

मी पेरलेत थोडे शब्द कालच्या भुईत
त्या स्पर्श जीवनाचा आज लाभू दे

बंदिस्त काल होते झाले ते मोकळाले
घेण्यास त्या भरारी अवकाश लाभू दे

भिडतील काळजाला विसरोनी वर्णभेद
मिरवावयास ऐसी जात लाभू दे

माझे मी काय गातो, देणे गुणिजनांचे
शब्दांस अमृताचे वरदान लाभू दे

-काव्य सागर

शब्दकळा

Sunday, September 17, 2017

लिहीन म्हणता लिहून जातो कविता एखादी
शब्द देखणे वेचून घ्यावे म्हणतो त्या आधी

शब्दांचे या सडे पसरता अंगणी मनाच्या
बहरून येई प्रतिभा रंगे संग जीवनाच्या

जरा कुठे बेसावध होता मी एखादी वेळ
शब्दांनी या डाव साधला नवा मांडला खेळ

पुन्हा लिहाया जरी बैसलो मांडुनिया मी ठाण
कसे नव्याने लाभायाचे शब्दांचे वरदान

आताशा मज रमणे नाही काव्याच्या सागरी
शब्दांविन ती कविता माझी अधुरी राहो जरी

-काव्य सागर

कविता अशीच असते

Monday, December 3, 2012

मी एक कविता लिहिली
आणि फेकून दिली रस्त्यावर...
आता तिचे भवितव्य तीच जाणे !

ती वाऱ्याशी गुजगोष्टी करेल
त्यावर स्वार होऊन तरंगत राहील
तेव्हा कुणीतरी सहज खिडकीपाशी गुणगुणताना
सापडेल त्याला अलगदपणे...

कदाचित मातीत मिसळूनही जाईल
आणि उगवेल एखाद्या रातराणीच्या रूपात
मग कुणीतरी हिची तुलना तिच्याशी करेल
तेव्हा मोहरून जाईल ती...

अगदीच नाही तर मग
पावसात चिंब चिंब होऊन
जलसरींच्या नादाशी एकरूप होईल
बेमालूमपणे एखादे गीत होऊन...

अन हेही जमले नाही तर
ज्या ठिकाणी शेवटचा श्वास घेतला
तेथून जाणाऱ्या एखाद्या कवीला झपाटून टाकेल
पण आपले ध्येय साध्य केल्याशिवाय तिला शांती लाभणार नाही...

कविता अशीच असते...कविता अशीच गवसते.

-काव्य सागर

शब्दांवाचून

Tuesday, August 21, 2012

एक एक कविता माझी विकेन म्हणतो मी
शब्दांवाचून पुन्हा जगाया शिकेन म्हणतो मी

या जगण्याला कधी लाभला शब्दांचा आधार ?
शब्द असे भिनतात अंगी की जणू जडे आजार

व्याधी नसते साधी ही जी आपसूक जडलेली
कधी उपाशी शब्दाविन ती मूकपणे अडलेली

तरी रंगुनी शब्दमहाला नवे मांडले काही
कसे नकळता नयनातून या शब्द सांडले काही

भौतिकतेच्या या जगती हे काव्य कशाला पुरे
मी गेल्यावर शब्दाखेरीज काय तळाशी उरे ?

अता न भुलन्याचा शब्दांना केला मी निर्धार
वैद्य म्हणे हा रोग असे अन हाच असे उपचार

पोकळ साऱ्या बाता तरीही टिकेन म्हणतो मी
शब्दांवाचून पुन्हा जगाया शिकेन म्हणतो मी

-काव्य सागर

कवितेपायी

Friday, July 22, 2011

कुठल्याश्या कवितेपायी 
मी विसरून गेलो तुजला 
हे भास असे प्रतिदिवशी
होतात सखे ग मजला

मी विसरून गेलो आहे
तुजवर रचल्या कविता
पण शब्द शब्द कवितेचे 
मी लिहिले तुझ्याचकरिता

तू सोडून मज जाताना
जी लकेर गाऊन गेली
त्या नाजूक वेलीवरती 
कवितेची फुले उमलली 

हे काय मला मग झाले 
कवितेचे वेडच जडले 
अन शब्द ओंजळीत घेता 
प्रतिबिंब तुझेच पडले 
 
पण कवितेचे दुर्भाग्य
ती सवत तुझी बघ झाली
अन याद तुझी जपताना 
माझ्यातच विलीन झाली 

-काव्य सागर

कारणे घ्या..

Tuesday, June 22, 2010

मी कविता करतो कारण...
तेच मला जमते
आणि त्याहून इतर काही जमत नाही
जमत असले तरी रुचत नाही
म्हणून जे काही सुचते ते लिहित जातो

मी कविता करतो कारण...
इतर कशाहीपेक्षा
त्यातच मन रमते
कविता केल्यावर होणारा आनंद
शब्दात मांडता येत नाही
(सगळ्याच गोष्टी कवितेतून व्यक्त करता येत नाहीत)

मी कविता करतो कारण...
जेव्हा जेव्हा लिहायला घेतो
तेव्हा मीच मला गवसत जातो
प्रत्येक कविता नवी उमेद,
नवा जन्म देऊन जाते

मी कविता करतो कारण...
फारसा वेळ लागत नाही
अस्वस्थ मनाला कागदावर उतरवले की झाले
खासा वेळ काढून
लिहिण्याचा कार्यक्रम आखता येत नाही

मी कविता करतो कारण...
फार खर्चही होत नाही
कोरा कागद आणि पेन एवढ्या
फुटकळ साहित्यावर अनेक
कविता रंगवता येतात

मी कविता करतो कारण...
कविता करायला आवडतात
हव्या तशाच कविता लिहिता येतात
सूर लागला नाही अशी
कारणे द्यावी लागत नाहीत

मी कविता करतो कारण...
शब्दच येतात बहरुन
मी फक्त लिहिण्याचे कष्ट घेतो
अन् कित्येकदा तेही घेत नाही!

मी कविता करतो कारण...
गाणे जरी जमत नसले
तरी शब्द तालावर घोंगावत राहतात
अन् अंतरंगीचा सूर लाभला
तरी कवितेचे गाणे होतेच

मी कविता करतो कारण...
एकटेपणाला याहून चांगली
सोबत नाही
अन् कवितेशिवाय एकाकी जीवन
शोभत नाही

मी कविता करतो कारण...
...कारण हा माझा प्रांत आहे
कविता करायला हजार कारणे सापडतील
पण कविता न करण्याची कारणे
कुणाला द्यावी लागत नाही
-काव्य सागर

कवितांचा पसारा

Wednesday, May 12, 2010

कविता सूचायला लागल्या
की एक सोडून भाराभर सुचू लागतात
आणि बहुतेकदा एका कवितेचा
दुसर्‍या कवितेशी कुठेही संबंध नसतो

एक ओळ गाठीशी धरून
कविता लिहायला घ्यावी
तर त्याच धाटणीच्या
अनेक ओळी रांगेत उभ्या असतात

त्यातील प्रत्येक ओळ आपआपले
रंग दाखवू लागते
मग कधी उदास...
तर कधी आशावादी
कधी वृत्तबंध...
तर कधी मुक्तछंदी

बर्‍याच ओळींच्या गोळाबेरजेतून
अनेक कवितांचा पसारा मांडतो
त्यात कित्येक कविता
एकमेकांत गुंतून पडलेल्या...

मग त्यांना शहाण्या मुलासारखे
हाताला धरून वेगवेगळ्या कवितेत मांडावे लागते
तेव्हा कुठे कविता कळू लागते
तुम्हालाही अन् मलाही...!

-काव्य सागर

कोर्स

Tuesday, May 11, 2010

तशा डिग्र्या बर्‍याच
मिळवल्या आतापर्यंत !
ग्रॅज्युएशन झाले, पोस्ट ग्रॅज्युएशन झाले
सी.ए. ही झाले !
आता पुढे काय?

एखादा कवितांचा कोर्स
करीन म्हणतो...
म्हणजे तशा फुटकळ
कविता करतोच मी

पण डिग्रीशिवाय
वॅल्यू कुठे ?
म्हणूनच सध्या
'कवी' ही डिग्री मिळवण्याच्या
फंदात पडत आहे

तुम्हाला काही माहीत
असल्यास प्लीज कळवा हं !

-काव्य सागर

''कविता कशा सुचतात रे ?''

Wednesday, December 16, 2009

''कविता कशा सुचतात रे ?''
माझ्या मित्राचा नेहमीचा प्रश्न
मी त्याकडे पाहतो आणि फक्त हसतो

'' अरे फार काही अवघड नाही रे
एक कोरा कागद, एक पेन आणि अस्वस्थ मन
एका जागी जमले, सूर जुळले की
मग होऊन जाते कविता
वार्‍यावर उडणार्‍या पिसाप्रमाणे मन भरकटू लागते
अन् भरकटल्यासारख्या कविता करू लागते
आता हल्ली कविता भरकटत चालल्या आहेत खर्‍या
पण जिथे माणूसच भरकटत आहे तिथे कवितांच काय ?

कविता म्हणजे स्वातंत्र्य, कविता म्हणजे मोकळा श्वास
कुणी शिकवून येत नाहीत रे कविता
इथे शब्दांची जुळवाजुळव नको अन् भावनांचा आविष्कार ही नको
केवळ जे सुचेल ते लिहावे, मनास रुचेल ते लिहावे
कुणाच्या तरी प्रेमात ही पडावे
एकदा तिच्या प्रेमात पडलो की कवितांची वेल अशी बहरते म्हणून सांगू...
मग ध्यानी मनी केवळ प्रेमाच्याच कविता...
प्रेम असेपर्यंत सगळे ठीक असते
पण विरहात मात्र शब्दच अधिक साथ देतात
मग शब्दांच्या प्रेमापुढे ते प्रेम फिके वाटू लागते
बघता बघता आपण कवितेच्याच प्रेमात पडू लागतो

पहिल्यांदा जो फक्त छंद असतो
त्याची नंतर सवयच लागते
वेड्यासारख्या कविताच करायला लागतो
दिवसभर जिथे तिथे कविताच
रात्र-रात्र जागून काढली आहे रे
आणि अंधारात चाचपडत एका कोर्‍या कागदावर
दिसत नसतानाही कविता लिहिली आहे
काय सांगू तुला ?

हे वेडेपण अंगात भिनत जाते
आणि वेडेपणाने जगण्यात खरा शहानपणा आहे हेही कळत जाते
मग शहाण्यासारखे जगण्याचा वेडेपणा कोण करणार ?
हळूहळू व्यसनच लागते कवितांचे
मग आपल्या नेहमीच्या बोलण्यालाही लोक कविताच समजू लागतात
अर्थात आपल्याला काही फरक पडत नाही
आपण स्वछन्दपणे या आभाळात विहरतो
सुख-दु:खाच्या या फसव्या जगापासून
आपण केव्हाच मुक्त होऊन जातो
आता फक्त मी आणि माझी कविता
मी तिच्यात भिनत जातो आणि ती माझ्यात... ''

एवढे सांगून ही हे शहाणे लोक काही समजत नाही
आणि शेवटी वेड्यासारखा प्रश्न विचारून मोकळे होतात

'' मला शिकवशील का रे कविता ?''
मी त्याकडे पाहतो आणि फक्त हसतो....

-काव्य सागर