कविता अशीच असते

Monday, December 3, 2012

मी एक कविता लिहिली
आणि फेकून दिली रस्त्यावर...
आता तिचे भवितव्य तीच जाणे !

ती वाऱ्याशी गुजगोष्टी करेल
त्यावर स्वार होऊन तरंगत राहील
तेव्हा कुणीतरी सहज खिडकीपाशी गुणगुणताना
सापडेल त्याला अलगदपणे...

कदाचित मातीत मिसळूनही जाईल
आणि उगवेल एखाद्या रातराणीच्या रूपात
मग कुणीतरी हिची तुलना तिच्याशी करेल
तेव्हा मोहरून जाईल ती...

अगदीच नाही तर मग
पावसात चिंब चिंब होऊन
जलसरींच्या नादाशी एकरूप होईल
बेमालूमपणे एखादे गीत होऊन...

अन हेही जमले नाही तर
ज्या ठिकाणी शेवटचा श्वास घेतला
तेथून जाणाऱ्या एखाद्या कवीला झपाटून टाकेल
पण आपले ध्येय साध्य केल्याशिवाय तिला शांती लाभणार नाही...

कविता अशीच असते...कविता अशीच गवसते.

-काव्य सागर