कवितांचा पसारा

Wednesday, May 12, 2010

कविता सूचायला लागल्या
की एक सोडून भाराभर सुचू लागतात
आणि बहुतेकदा एका कवितेचा
दुसर्‍या कवितेशी कुठेही संबंध नसतो

एक ओळ गाठीशी धरून
कविता लिहायला घ्यावी
तर त्याच धाटणीच्या
अनेक ओळी रांगेत उभ्या असतात

त्यातील प्रत्येक ओळ आपआपले
रंग दाखवू लागते
मग कधी उदास...
तर कधी आशावादी
कधी वृत्तबंध...
तर कधी मुक्तछंदी

बर्‍याच ओळींच्या गोळाबेरजेतून
अनेक कवितांचा पसारा मांडतो
त्यात कित्येक कविता
एकमेकांत गुंतून पडलेल्या...

मग त्यांना शहाण्या मुलासारखे
हाताला धरून वेगवेगळ्या कवितेत मांडावे लागते
तेव्हा कुठे कविता कळू लागते
तुम्हालाही अन् मलाही...!

-काव्य सागर

कोर्स

Tuesday, May 11, 2010

तशा डिग्र्या बर्‍याच
मिळवल्या आतापर्यंत !
ग्रॅज्युएशन झाले, पोस्ट ग्रॅज्युएशन झाले
सी.ए. ही झाले !
आता पुढे काय?

एखादा कवितांचा कोर्स
करीन म्हणतो...
म्हणजे तशा फुटकळ
कविता करतोच मी

पण डिग्रीशिवाय
वॅल्यू कुठे ?
म्हणूनच सध्या
'कवी' ही डिग्री मिळवण्याच्या
फंदात पडत आहे

तुम्हाला काही माहीत
असल्यास प्लीज कळवा हं !

-काव्य सागर

सुतक

Monday, May 10, 2010

माझ्या गावी दु:खाचा पूर आला
सोबतीला आसवांचा पाऊस झाला
म्हणून मी सुतक पाळले...

जोपर्यंत सारे पूर्ववत होत नाही
...तोपर्यंत
जोपर्यंत जखम भरून येत नाही
...तोपर्यंत

कदाचित काही काळानंतर
सारे पूर्ववत होईल ही
जखमा भरून येतील ही
मग पुन्हा सुखाचे दिवस येतील
अन् सुतक संपेल ही

पण...
अशी अनेक गावे असतील
जिथे कायमचाच दुष्काळ असेल
जिथे दिवस उजाडत नसेल
जिथे शेतात फक्त काटेच उगवत असतील
जिथे सुखाचे वारे वाहत नसतील

त्यांनी का आयुष्यभर
सुतकच पाळावे ?

-काव्य सागर

प्रवाह

Friday, May 7, 2010

रात्री झोपण्यापूर्वी मी मोबाईलवर गाणी ऐकत असताना
कुठून तरी ती चिमुरडी आली आणि
सर्र्कन माझ्या नकळत तिने हेडफोनची वायर खेचली
आणि एकदम...हॉस्पिटलमध्ये
शरीरात रक्त भरून घेणार्‍या पेशंटला जाग यावी
तसा मी भानावर आलो !
पाहतो तर मोबाईल मधून संगीतरूपी रक्त वाहते आहे !
मी पटकन खंडित झालेला प्रवाह जोडला
आणि पुन्हा पूर्वीसारखे संगीत वाहू लागले

तरी बरे मी झोपलो नव्हतो
नाहीतर किती रक्त वाया गेले असते
कुणास ठाऊक ?

-काव्य सागर