माणसे...

Monday, November 1, 2010

माणूस म्हणून जन्माला आलो तेव्हापासून...
पाहतो आहे सारी माणसे
माणसे, त्यांचे रंगीबेरंगी चेहरे, त्यांचे स्वभाव

तेव्हा कळली फक्त त्यांची नावे...
आता कुठे माणूस म्हणून कळू लागली आहेत...
आता कुठे काही मुखवटे गळून पडले आहेत...

ते गळण्यापूर्वी दिसत होते ते किती सुंदर हसरे चेहरे...
ते कळण्यापूर्वी भेटत होती न कळलेली काही माणसे...

ईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती असलेला तो प्राणी
अधूनमधून भेटतोही..पण फार दुर्मिळ...

आणि तेव्हापासून येता-जाता आरशासमोर आलो की...
माझा चेहर्‍यावर ही कुठले मुखवटे चढले नाहीत ना
याची खात्री करून घेतो...मगच माणूस म्हणून मिरवतो...!

-काव्य सागर

निर्विकार

Wednesday, September 22, 2010

हल्ली कसलाच परिणाम
होत नाही माझ्यावर
सर्व त्रास, सर्व दु:खे
निमूटपणे सहन करत राहतो मी
सर्व वेदना शांतपणे भोगत राहतो मी
शेवटी मग वेदनाच कंटाळून निघून जातात
आणि चेहर्‍यावर उरतात फक्त काही निर्विकार भाव
काहीतरी जिंकल्याचे...
बरेच काही हरल्यानंतर...

-काव्य सागर

वादळानंतर...

Thursday, August 26, 2010

साजिर्‍याशा एका संध्याकाळी
कोठून जाणे कसे वादळी वारे आले
अन् बघता बघता सारे उद्ध्वस्त झाले
माझी स्वप्ने, माझ्या महत्वाकांक्षा
सारे सारे वाहून गेले

मी शोधू पाहतोय माझी
कवितांची वही,
माझ्या गाण्यांचे रेकॉर्ड्स
पण स्मृतिभ्रंश झाल्याप्रमाणे
काहीच आठवत नाही...

आणि त्यानंतर सुन्न मनाने
डोळे मिटून घेतो
तेव्हा घुमत राहतात
त्याच वादळी वार्‍याचे आवाज
कानामध्ये, मनामध्ये...
- काव्य सागर

विश्वास

Friday, August 13, 2010

माझा विश्वास नाही!
कशावरही; कुणावरही
विश्वास बाळगावा तरी का?

या मार्गाच्या कुठल्याश्या
वळणावर 'घात' होऊन
विश्वासघात होण्याची 'शक्यता' ( विश्वास नव्हे!)
जिथे आहे तिथे-
विश्वास कुणावर ठेवावा?

म्हणूनच मी विश्वास ठेवत नाही...
असलाच तर आत्मविश्वास आहे
स्वत:वर, स्वत:च्या विचारांवर,
कर्तृत्वावर वगैरे वगैरे...

कारण इथे घात होणार नाही
असा माझा 'विश्वास' आहे

मी माझा विश्वासघात करणे
शक्य नाही....
( आणि केलाच तरी तो
कळणार कुणाला ?)

-काव्य सागर

आता सारे शांत शांत

Tuesday, June 29, 2010

आता कसे सारे शांत शांत होईल

मेघ दाटून येतील, पाऊस ही बरसेल
मग सारी सृष्टी निवांत होईल

जलधारांनी या धरणीची आग शमेल
मग उन्हाळी ऋतूचा सुखांत होईल

दु:खाचे मळभ जाईल, नभ सावळे होईल
मग ही धरणी सुखाचा प्रांत होईल

उन्हे कोवळी पसरतील, इंद्रधनू उतरेल
या धरेवरी मग स्वर्गाचा भ्रांत होईल

-काव्य सागर

कारणे घ्या..

Tuesday, June 22, 2010

मी कविता करतो कारण...
तेच मला जमते
आणि त्याहून इतर काही जमत नाही
जमत असले तरी रुचत नाही
म्हणून जे काही सुचते ते लिहित जातो

मी कविता करतो कारण...
इतर कशाहीपेक्षा
त्यातच मन रमते
कविता केल्यावर होणारा आनंद
शब्दात मांडता येत नाही
(सगळ्याच गोष्टी कवितेतून व्यक्त करता येत नाहीत)

मी कविता करतो कारण...
जेव्हा जेव्हा लिहायला घेतो
तेव्हा मीच मला गवसत जातो
प्रत्येक कविता नवी उमेद,
नवा जन्म देऊन जाते

मी कविता करतो कारण...
फारसा वेळ लागत नाही
अस्वस्थ मनाला कागदावर उतरवले की झाले
खासा वेळ काढून
लिहिण्याचा कार्यक्रम आखता येत नाही

मी कविता करतो कारण...
फार खर्चही होत नाही
कोरा कागद आणि पेन एवढ्या
फुटकळ साहित्यावर अनेक
कविता रंगवता येतात

मी कविता करतो कारण...
कविता करायला आवडतात
हव्या तशाच कविता लिहिता येतात
सूर लागला नाही अशी
कारणे द्यावी लागत नाहीत

मी कविता करतो कारण...
शब्दच येतात बहरुन
मी फक्त लिहिण्याचे कष्ट घेतो
अन् कित्येकदा तेही घेत नाही!

मी कविता करतो कारण...
गाणे जरी जमत नसले
तरी शब्द तालावर घोंगावत राहतात
अन् अंतरंगीचा सूर लाभला
तरी कवितेचे गाणे होतेच

मी कविता करतो कारण...
एकटेपणाला याहून चांगली
सोबत नाही
अन् कवितेशिवाय एकाकी जीवन
शोभत नाही

मी कविता करतो कारण...
...कारण हा माझा प्रांत आहे
कविता करायला हजार कारणे सापडतील
पण कविता न करण्याची कारणे
कुणाला द्यावी लागत नाही
-काव्य सागर

लाचारी

Monday, June 21, 2010

आजपर्यंत कायम ताठ मानेने जगत आलो
कधीच हार मानली नाही
कधीच लाचारी पत्करली नाही
कधीच परिस्थितीपुढे हात टेकले नाही...

...पण हल्ली कविता करायला लागल्यापासून
खाली मानेने निमूटपणे लिहित चाललो आहे
-काव्य सागर

कवितांचा पसारा

Wednesday, May 12, 2010

कविता सूचायला लागल्या
की एक सोडून भाराभर सुचू लागतात
आणि बहुतेकदा एका कवितेचा
दुसर्‍या कवितेशी कुठेही संबंध नसतो

एक ओळ गाठीशी धरून
कविता लिहायला घ्यावी
तर त्याच धाटणीच्या
अनेक ओळी रांगेत उभ्या असतात

त्यातील प्रत्येक ओळ आपआपले
रंग दाखवू लागते
मग कधी उदास...
तर कधी आशावादी
कधी वृत्तबंध...
तर कधी मुक्तछंदी

बर्‍याच ओळींच्या गोळाबेरजेतून
अनेक कवितांचा पसारा मांडतो
त्यात कित्येक कविता
एकमेकांत गुंतून पडलेल्या...

मग त्यांना शहाण्या मुलासारखे
हाताला धरून वेगवेगळ्या कवितेत मांडावे लागते
तेव्हा कुठे कविता कळू लागते
तुम्हालाही अन् मलाही...!

-काव्य सागर

कोर्स

Tuesday, May 11, 2010

तशा डिग्र्या बर्‍याच
मिळवल्या आतापर्यंत !
ग्रॅज्युएशन झाले, पोस्ट ग्रॅज्युएशन झाले
सी.ए. ही झाले !
आता पुढे काय?

एखादा कवितांचा कोर्स
करीन म्हणतो...
म्हणजे तशा फुटकळ
कविता करतोच मी

पण डिग्रीशिवाय
वॅल्यू कुठे ?
म्हणूनच सध्या
'कवी' ही डिग्री मिळवण्याच्या
फंदात पडत आहे

तुम्हाला काही माहीत
असल्यास प्लीज कळवा हं !

-काव्य सागर

सुतक

Monday, May 10, 2010

माझ्या गावी दु:खाचा पूर आला
सोबतीला आसवांचा पाऊस झाला
म्हणून मी सुतक पाळले...

जोपर्यंत सारे पूर्ववत होत नाही
...तोपर्यंत
जोपर्यंत जखम भरून येत नाही
...तोपर्यंत

कदाचित काही काळानंतर
सारे पूर्ववत होईल ही
जखमा भरून येतील ही
मग पुन्हा सुखाचे दिवस येतील
अन् सुतक संपेल ही

पण...
अशी अनेक गावे असतील
जिथे कायमचाच दुष्काळ असेल
जिथे दिवस उजाडत नसेल
जिथे शेतात फक्त काटेच उगवत असतील
जिथे सुखाचे वारे वाहत नसतील

त्यांनी का आयुष्यभर
सुतकच पाळावे ?

-काव्य सागर

प्रवाह

Friday, May 7, 2010

रात्री झोपण्यापूर्वी मी मोबाईलवर गाणी ऐकत असताना
कुठून तरी ती चिमुरडी आली आणि
सर्र्कन माझ्या नकळत तिने हेडफोनची वायर खेचली
आणि एकदम...हॉस्पिटलमध्ये
शरीरात रक्त भरून घेणार्‍या पेशंटला जाग यावी
तसा मी भानावर आलो !
पाहतो तर मोबाईल मधून संगीतरूपी रक्त वाहते आहे !
मी पटकन खंडित झालेला प्रवाह जोडला
आणि पुन्हा पूर्वीसारखे संगीत वाहू लागले

तरी बरे मी झोपलो नव्हतो
नाहीतर किती रक्त वाया गेले असते
कुणास ठाऊक ?

-काव्य सागर

दु:ख नव्हतेच इतके

Friday, April 30, 2010

दु:ख नव्हतेच कधी इतके
जितके मला वाटले होते
प्रश्न ही नव्हते इतके अवघड
जे मनी दाटले होते

मी उगाचच समस्यांना
भाव देत होतो
स्वत:हून मनास माझ्या
घाव देत होतो
जे कोडे सुटणार होते सहजतेने
त्यात उगाच जीवास गुंतत होतो

अडथळे यायचेच असतात
यशाच्या मार्गात
वाट शोधताना चालायचे
आहेच काट्यांत
मी दुखर्‍या जखमेस जपताना
व्यर्थ अश्रू ढाळीत होतो

अजुन कित्येक दु:खे बाकी
आहेत जगात
मदतीस सरसावताहेत अजुनी
असहाय्य हात
माझे दु:ख होते खरे राईएवढे
ज्यास मी पर्वतासम मानत होतो

-काव्य सागर

आसक्ती

Thursday, April 29, 2010

मला काय हवे आहे?
माहीत नाही...खरंच माहीत नाही...
मला कसलीच आसक्ती नाही
मी कशाला जगत आहे ? कोणासाठी जगत आहे?
आपल्या लोकांसाठी? छे!
प्रेम, आपुलकी, माया कसलीच बंधने मला बांधत नाहीत
मग काय हवे आहे मला?

पैसा, नाव, प्रसिद्धी की अजून काही?
पण मला कशाचाच लोभ, हव्यास नाही
मला फक्त जगायचंय!
जगण्याच्या उमेदीपुढे सारे थिटे
आणि तितकेच फसवे आणि खोटे !

मला कसलीच गरज भासत नाही
भौतिक गरजा आहेत पण त्या
फक्त शरीर जगवण्यासाठी
मनाचे काय?
ते कुठेच थांबत नाही
कुठेच रमत नाही

कविता करतो मी
पण फक्त सुचतात म्हणून
त्यांचे व्यसन नाही जडले अजून
इतर ही अनेक छंद आहेत
पण छंदांचा कंटाळा आला तर काय करावे?

काय केले म्हणजे जीवास शांतता लाभेल
नामस्मरण करावे तर देवावर श्रद्धा नाही
काम करावे तर उगाच जीवास त्रास का?

हे असे रोजचेच झाले आहे
आला दिवस ढकलण्याचे
उद्योग तेवढे सुरू आहेत
आणि हे असेच चालू राहणार
शेवटचा श्वास असेपर्यंत
बहुतेक त्यांची तरी साथ लाभेल...!

-काव्य सागर

अस्वस्थाचे जीणे

Tuesday, April 6, 2010

विचारांची वर्दळ अन् मनाची मरगळ
यातून जन्मा आले माझे अस्वस्थाचे जीणे
कामांची धावपळ अन् जीवाची होरपळ
यातून नशिबी आले माझे अस्वस्थाचे जीणे

रोज नवा प्रश्न त्याचे रोज नवे उत्तर
भिंती झाल्या पोलादी पण गळके माझे छप्पर
आमच्या माती सदैव घामाच्या धारांनी न्हाने
म्हणून आमच्या नशिबी आले अस्वस्थाने जीणे

दुरावाल्या देशाची भेट काही होत नाही
चक्रावल्या वाटाही थेट घरी येत नाही
आम्ही आमच्या घरी पोचण्या पत्ता शोधत जाणे
म्हणून आमच्या नशिबी आले अस्वस्थाने जीणे

वसंत नशिबी आला न अन् शिशीर आला कधीही
चांदणे लाभले ग्रीष्माचे पण ते ही न टिकले क्षण ही
फूल न आले दारी माझे आली केवळ पाने
म्हणून आमच्या नशिबी आले अस्वस्थाने जीणे

डोळ्यात माझिया एक घेऊन निघालो स्वप्न
पण अडवत होते मजला वाटेत अनामिक प्रश्न
या प्रश्नातुनही मजला न सुचले कधीही गाणे
म्हणून आमच्या नशिबी आले अस्वस्थाने जीणे
-काव्य सागर

नाते तुझ्या-माझ्यातले

Tuesday, February 23, 2010

मी कधी ना तोडले नाते तुझ्या-माझ्यातले
तूच माझ्या पासुनी का दूर जाऊ लागली

मी तुझ्या डोळ्यांमध्ये जी पहिली होती अदा
तीच आता घाव घालूनी डाव साधू लागली

मीच वेडा गात होतो गंजले गाणे जुने
तू नव्याने जीवनाचे गीत गाऊ लागली

श्वास माझे गुंतले होते तुझ्या श्वासामध्ये
तू स्वत:ला जाळूनी मजला ही जाळू लागली

काय म्हणूनी जाहलो होतो तुझा वेड्यापरि
तूच या वेड्याची आता साद टाळू लागली

रिक्त आणिक कोरडे झाले जीणे माझे आता
आज सारी जिंदगी ही व्यर्थ वाटू लागली

-काव्य सागर

जरा जगून बघू...

Friday, January 22, 2010

रोज रोज पुन्हा पुन्हा
तेच रडगाणे
ओठांवरी हसू तरी
किती रे बहाने
पुर्‍या झाल्या पळवाटा
थोडे थांबून बघू
जरा जगून बघू...

कोण तुझे कोण माझे
शोधायला वेळ नाही
धावत्या पायाचा माझ्या
घड्याळाशी मेळ नाही
वेळ-काळ विसरून पुन्हा एकवार
कधीतरी पायवाट चुकुन बघू
जरा जगून बघू...

दु:ख माझ्या उरातले
रोज रोज सलते हे
सुख जरी नाममात्र
तरी कुठे मिळते हे
सोड सार्‍या दु:खचिंता मनाच्या तळ्यात
घेउनिया झेप जरा उडून बघू
जरा जगून बघू...

प्रेम माझे सांगण्यास
माझ्यापाशी बोल नाही
तरी मुकेपणाचेच
क्षण अनमोल काही
हात हाती घेउनिया सांज ढळताना
आभाळीचा चंद्र तिच्या डोळ्यात बघू
जरा जगून बघू...

मन दु:खाच्या भरात
जरी होई दीनवाणे
मुखवट्यांच्या जगात
ओठी सुखाचे तराणे
शहाण्याचे सोन्ग पुरे, मनातून खरे
वेड्यापरि थोडे आता वागून बघू
जरा जगून बघू...
-काव्य सागर

सांग सांग देवा सांग

Wednesday, January 13, 2010

सांग सांग देवा सांग। हे शिक्षण नडेल काय ?
गळ्या भोवती फास आवळून प्रश्न सुटेल काय?

देवा सांग अभ्यासाचे ओझे झेपेल काय ?
स्पर्धेच्या या रणामध्ये आयुष्य संपेल काय ?
सांग सांग देवा सांग। हे शिक्षण नडेल काय ?
गळ्या भोवती फास आवळून प्रश्न सुटेल काय?

चढाओढी मध्ये वर्षे चालली सरत
सुखाचे हे बालपण येईल का परत
सांग सांग देवा सांग। हे शिक्षण नडेल काय ?
गळ्या भोवती फास आवळून प्रश्न सुटेल काय?

शाळेच्या या जेलमध्ये रोज नवा पेपर
फुलांवरी का रे असे काट्याचे भार
सांग सांग देवा सांग। हे शिक्षण नडेल काय ?
गळ्या भोवती फास आवळून प्रश्न सुटेल काय?

- काव्य सागर