ध्यास

Friday, April 24, 2020

तू सोडून गेलीस तेव्हा 
आसवे गाळली नाही 
स्मरणात तुझ्या मी फक्त
लिहिल्यात कविता काही 

नव्हतीस सोबती म्हणुनी
मी उदास झालो नाही 
पण पावसात भिजताना
मोहरलो न एकदाही 

डोळ्यांना अजुनी माझ्या
विसराया जमले नाही 
प्रत्येक चेहऱ्यामध्ये
ते रूप तुझेच पाही 

तू येशील जर परतुनी
कधी आठव येता माझी 
होतील सावळे नभ हे
गातील दिशा या दाही 

ऐकून साद ह्र्दयाची
मिटवून अंतरे सारी 
तू परतावे मजपाशी
हा ध्यास उराशी राही 

-काव्य सागर 

तख्त

Wednesday, April 22, 2020

सांडले रस्त्यावरी ते रक्त कोणाचे?
एकमेका भांडले ते भक्त कोणाचे?

ते म्हणाले विजय झाला लोकशाहीचा
लेकशाही राखते ते तख्त कोणाचे?

चिरडुनी कमळास देवा वाहिली भक्ती 
उमलले कोठे बघू प्राजक्त कोणाचे? 

सहज ते घेतात शपथा मारुनी थापा
सत्य का व्हावे कधीही व्यक्त कोणाचे?  

ठार केले संतही रागात येऊनी
सोडले येथे वळू उन्मत्त कोणाचे?

-काव्य सागर 

सोबत

Saturday, April 18, 2020

अडगळीच्या खोलीत सापडली 
एक जुनी कवितांची वही

धुळीत माखलेले काही शब्द 
आणि काही भावना कोंडलेल्या

काही मोडक्या तोडक्या चाली
अन् न लागलेले गंधारही

पूर्ण न केलेल्या काही कविता
आणि धूसर झालेले विचार 

आता या कवितांचं काय करायचं? 

घरदार, कर्तव्ये सांभाळतील ही मुलंबाळं 
कवितेस कोण सांभाळणार? 
तिच्या अपेक्षांचे ओझे फार आहे... 

फार बोलत नाही म्हणा ती! 
पण मी जाणतोच तिच्या मनातले

तिच्या पूर्णत्वाची आस लागून 
चार दिवस अधिक जगेन कदाचित

आणि नाहीच जमले तर मग
सरणावर माझ्यासोबत सती जायला
मागेपुढे पाहणार नाही ती

अनंतात विलीन झाल्यावरच
मुक्ती लाभेल तिला 
आणि त्यामुळेच मलाही

-काव्य सागर